घटना 1: स्वामी कोणाला म्हणावे ?
घटना 1: स्वामी कोणाला म्हणावे ?
अगदी आपण आपल्या घरामध्ये असताना म्हणतो की, मी या घरचा मालक आहे. तेव्हा आपल्या मध्ये जी भावना असते, तिला स्वामीत्वाची भावना म्हणतात. माझ्या मनाजोगता उपभोग घेता येतो. त्यावरील अन्य कुणाचा काही हक्क असल्यास तो मला ठरविता येतो. त्यावर अन्य हक्का व्यतिरिक्त सामुदायिक हक्क असल्यास, तो देखील मला ठरविता येतो, किमान तसे ठरविण्याच्या निर्णय प्रक्रियेत माझा सक्रिय व निर्णयकारक सहभाग असतो. इतकेच नव्हे वापरावर प्रतिबंध घालण्याच्या प्रक्रियेत देखील माझा निर्णायक सहभाग असतो. माझ्या घरातील कोणती वस्तु मी वापरायची का घरातील सर्वच घटकांनी समाईकपणे वापरायची याबाबत मला निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. हे स्वातंत्र्य एक प्रकारे स्वामीत्वाचे द्योतक आहे.
हीच बाब जेव्हा केवळ समाईकात वापरल्या जाणा-या वस्तूंबाबत जास्त विचार करावयाचे झाल्यास, मला माझ्या स्वातंत्र्या सोबत हेच स्वातंत्र्य समायिकात उपभोग घेणाऱ्या व्यक्तिनांही आहे हे लक्षात ठेवावे लागते. तेव्हा त्यास समायिक स्वामीत्वाचे नियम लागू होतात. समायिक स्वामित्वामध्ये मला इतरांच्या सोबत स्वामित्व प्राप्त होते. या पद्धतीने घरातील समाईक चीज वस्तूंचा आपण एकमेकांच्या सहकार्याने उपभोग घेतो. उपभोग होत असतांना इतरांच्या उपभोगासाठी त्या वस्तू सुस्थितीत राहतील याचे उत्तरदायित्व देखील आपण पार पाडत असतो. हे उत्तरदायित्व देखील या स्वामित्वा सारखेच समाईक असते. त्यानंतर समजा तुमच्या कुटूंबातील सदस्यसंख्या खूपच वाढते. जवळ जवळ दीड अब्ज इतकी. मग तुम्ही या कुटुंबाच्या सगळ्या चीज वस्तूंची तुमच्या मध्ये आपसातच विभागणी करण्या करिता आणि तुमच्या करिता त्याची देखभाल करण्या करिता तुमच्यातीलच काही लोकांना नेमतात. उपभोग घेण्याचा अधिकार तुम्ही तुमच्याकडे ठेवता. परंतु तुमच्या मध्ये उपभोग करण्यासाठी विभागणी करण्याचे अधिकार तुम्ही या लोकांना विभागून देता. तसेच तुम्हाला या पध्दतीने उपभोग घेता यावा म्हणून या चीज वस्तू देखभाल करण्याचे उत्तरदायित्व देखील याच नेमलेल्या लोकांना देता. या नेमलेल्या लोकांना हे सर्व काम करण्याकरिता त्यांच्या हाताखाली काही लोक नेमण्याचे अधिकार तुम्ही देता. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्या सगळ्या बाबी करण्या करिता कल्याणकारी धोरण ठरविण्याचे अधिकार देखील तुम्ही त्यांना देता.
कालांतराने देखभालीचा खर्च तसेच देखभाली करीता नेमलेल्या नोकरांचा तसेच तुमच्यातूनच नेमलेल्या लोकांचा खर्च तुम्हाला पेलवत नाही. तेव्हा तुम्ही तुमच्याच चीज वस्तूंचा योग्य विनियोग करून त्यातून हा खर्च भागविण्याचे अधिकार नेमलेल्या लोकांना व नोकरांना देता. हा विनियोग करण्याची धोरणे देखील अर्थातच या लोकप्रतिनिधी व नोकर वर्गाने त्यांच्या अधिकारात बनविण्याची आहेत. इथं पर्यंत सर्व काही ठीक आहे. तुमचे स्वामीत्व शाबूत आहे.
परंतु, पुढे घडते असे की, प्रतिनिधींना वाटू लागले की तुम्ही मालक नाही आहात. तर प्रतिनिधीच मालक आहेत. तर इकडे नोकर वर्गात असे वाटू लागते की तुम्ही नाहीत तुमचे प्रतिनिधी नाहीत, तेच तुमच्या चीजवस्तूंचे मालक आहेत. पुढे तुमच्या चीज वस्तुंची देखभाल करणे आणि त्यांचे तुमच्यासाठी योग्य वाटप करणे व तुमच्यासाठी त्यांचा विनियोग करणे याबाबी मागे पडतात. केवळ त्यासाठीच दिलेल्या अधिकारांचा वापर करणे, त्यातून प्रतिनिधीचा आणि नोकर वर्गाचा उत्कर्ष साध्य करणे याच बाबींना महत्त्व येऊ लागते. हे सर्व काही निर्धोकपणे करता यावे याकरिता तुम्हास तुम्ही स्वामी असल्याच्या वास्तविकतेचा विसर पडावा याकरीता मग पध्दतशीर प्रयत्न केले जातात.
छोटे उदाहरण द्यावयाचे झाल्यास जेव्हा तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही तुमचे प्रतिनिधी निवडण्या करीता निवडणूक घेता, तेव्हा तुम्ही अमुक यांना प्रतिनिधी निवडले, तमुक यांना प्रतिनिधी निवडले असे वार्तांकन होत नाही. तर आमुक गटांचा, तमुक गटांचा, अमुक पक्षाची, तमुक पक्षाची, तमुक व्यक्तीची सत्ता आली असे वार्तांकन केले जाते, तुमची सत्ता येतच नाही मग तुम्ही स्वामी कसले. याचे सरकार आले, त्याचे सरकार आले असे ऐकावे लागते. तुमचे सरकार येतच नाही.
आणखी दुसरे छोटे उदाहरण नोकर वर्गाबाबत द्यावयाचे झाल्यास, तुमच्या कुटुंबाच्या मालकीच्या चीज वस्तुची तुम्ही तोडफोड करता, तेव्हा ही बस महामंडळाची आहे असे तुम्ही म्हणता. जेव्हा कोणत्याही चीज वस्तूंचा वापर करायचा असेल तेव्हा हे शासनाचे आहे, वन खात्याचे आहे, ग्राम पंचायतीचे आहे, अशी तुमची स्वतःचीच भावना असते. मग तुम्ही स्वामी कसले ?
याच सर्व बाबी तुमच्या कुटुंबा बाबत घडल्या आहेत व घडत आहेत. कारण प्रतिनिधी व नोकर वर्ग यांना नेमण्याचे उद्दिष्ट काय हे तुम्ही विसरलात. तुमच्या कुटुंबातील सर्व चीज वस्तुंचे स्वामी तुम्ही आहात हे तुम्ही विसरलात.
एक साधे उदाहरण घेऊ, एकदा असे झाले की एकदा खूप उद्योगी, सत्शील चारित्र्याच्या, निर्मळ मनाच्या व्यक्तींच्या समुहाने काही उद्योग व्यवसाय चालू करण्याचे ठरविले. त्यामध्ये त्यांनी खूप मोठे भांडवल खूप दिर्घ मुदतीसाठी गुंतवले. व्यवसायाचा व्याप प्रचंड असल्यामुळे त्यांनी त्यांच्या व्यवसायाचे वेगवेगळे विभाग केले. त्यास एक मुख्य व्यवस्थापक नेमला. प्रत्येक विभागास उदा. सुरक्षा, अर्थ, वाणिज्य, उद्योग, कामगार कल्याण, लेखा परिक्षण, वाहतूक वगैरे व्यवसायाच्या आवश्यकते नुसार नावे दिली. या प्रत्येक विभागास एकेक विभाग प्रमुख नेमला. या नंतर या सर्व विभागाचा कार्यभाग हे विभाग प्रमुख व त्यांच्या विभागाच्या अन्य कर्मचारी तसेच मुख्य व्यवस्थापक यांच्यावर सोपवून मालकांचा समुह निर्धास्त झाला. विभाग प्रमुख व कर्मचारी सुरवातीस चांगले व सचोटीने काम करीत असल्याचा बहाणा करत असल्याने मालक आणखीच निर्धास्त झाले. कालांतराने मालकास विभाग प्रमुखांच्या व कर्मचाराच्या कारभारात लक्ष देण्याची आवश्यकता नसल्याचे भासू लागले. तेव्हा मालकाने मनसोक्त निद्रा घेण्यास सुरुवात केली. त्यामधील काही मालकास काही गोष्टींची आवश्यकता असल्याने मध्येच निद्रेतून जागे होऊन त्यांनी आमच्या व्यवसायातल्या या गोष्टी आम्हांस पोच करा असे विभाग प्रमुखांनी सांगितले. तेंव्हा विभाग प्रमुखांनी संगितले की, हे जे तुम्ही मागत आहात त्या बाबींवर हे जे कोणी झोपले आहेत, त्यांचा देखील हक्क आहे. त्यांची परवानगी आणा, मग पोच करू. आता झोपलेल्यांची परवानगी कोठून मिळणार ? त्यावर विभाग प्रमुखांनी सांगितले की मग ते तुम्हाला मिळणार नाही. सगळ्यांच्या कल्याणासाठी ते आम्ही आमच्याच ताब्यात ठेऊ. काही झोपलेले, काही अर्धवट जागे, काही पूर्ण जागे पण शक्तीही न एकवटलेले, अशी मालकांची अवस्था झाली. मग मला सांगा की, या उदाहरणातील व्यवसायाची काय अवस्था व्हावी ? त्या व्यवसायाचे उदा. तुमच्या कुटुंबास लागू झाल्यास तुमच्या कुटुंबाची अवस्था काय झाली असेल ?
माझ्या सुजान भारतीय नागरीकांनो, तुम्ही इतके चाणाक्ष नक्कीच आहात, की तुमच्या या कुटुंबाचे नाव भारतीय संघराज्य असल्याचे तुमच्या केव्हाच लक्षात आले असेल. जेव्हा एखाद्या शेताचा शेतकरी शेतात पेरा करुन त्यानंतर झोपा काढतो. तेव्हा त्या शेतात पीक येते. परंतु त्या पीकापेक्षा जास्त अनावश्यक तण माजते. एखादा कोंडाळा तुम्ही साफ नाही केलात तर त्याच्या घाणीमुळे डुकरे आणि भटकी कुत्री देखील माजतात. अर्थात जो झोपा काढतो आणि साफ सफाई करत नाही त्याला स्वामी म्हणता येत नाही. म्हणून तुमच्या कुटुंबाचे तुम्हास स्वामी व्हायचे असेल तर तुम्हाला जागरुक राहीले पाहिजे. जे अर्धवट जागे आहेत त्यांचे हात बळकट केले पाहिजे. कोंडाळे साफ करण्याच्या कामात तुम्ही जाणीवपुर्वक सहभाग घेतला पाहिजे, ते एकदा साफ झाले की दिवाळीत जशी घराची स्वच्छता केल्यानंतर तुम्हाला घर तुमचं वाटायला लागतं, तसा हा देश देखील तुम्हाला तुमचा वाटू लागेल. त्यानंतर मग योग्य विभागणी, योग्य विनियोग, अनावश्यक खर्च रोखणे अशा स्वामीत्वाच्या अनेक बाबीमध्ये निर्णायक सहभाग तुम्ही स्वामी म्हणून घेऊ शकाल. सध्या तुम्ही स्वामी आहात परंतु जेव्हा असा निर्णायक सहभाग घ्याल, तेव्हाच या कुटुंबाचा स्वामी असल्याचा म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार तुम्हास प्राप्त होईल. अन्यथा आज जसे आयुष्य तुम्ही जगत आहात तीच तुमची योग्य पात्रता असे खुशाल समजावे. भारत मातेच्या चरणाशी वाहिलेल्या एखाद्या शुभ्र फुला इतकेच, लेखक म्हणून मला मुल्य आहे. परंतु मी आज मांडलेल्या विचारांचे मुल्य भारत मातेच्या मुकुटा मधील कौस्तुभ मण्याच्या मूल्या पेक्षा किंचीतही उणे नाही. हा वाणीचा यज्ञ भारत मातेच्या चरणी अर्पण.
वंदे मातरम!
Jeet
Advocate Ranjitsinh Ghatge 🦅
9823044282 / 8554972433 / 9049862433
Comments
Post a Comment